आला श्रावण श्रावण…

आला श्रावण श्रावण…

आज श्रावण शुद्ध प्रतिपदा. श्रावण मासाची सुरुवात. हिंदू धर्मामध्ये या महिन्याला खूप महत्व आहे. वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये, जातींमध्ये, चालत आलेल्या रुढी –परंपरांनुसार या महिन्यात वेगवेगळी व्रत वैकल्ये केली जातात. काहींची यावर अपरंपार श्रद्धा असते, तर काहींना हे कर्मकांड वाटत. लहानपणापासून या श्रावणाची एक वेगळीच उत्सुकता वाटत आली आहे. आजी, आत्या, काकू, आई, मावशी, शेजारी पाजारी राहणाऱ्या स्त्रिया, मैत्रिणी, यांच्या कडून वेगवेगळ्या सणांचे संमिश्र संस्कार होत गेले. पण, आई ही तर पहिली गुरु…सर्वच बाबतीत. आई देखील तिच्या लहानपणापासून तिच्या घरातील स्त्रियांच्या संस्कारात वाढलेली. थोड्याश्या कर्मठ कुटूम्बामधली. तरीही नोकरी सांभाळून तिला जितकी आपली संस्कृती जपता आली, तितकी तिने जपली आणि आपल्या मुलींनाही त्याची ओळख करून दिली. माझी आई नोकरी आणि घर सांभाळणाऱ्या पिढीतली. पुष्कळ तर्कसंगत विचार करणारी. तिने अंधश्रद्धेने कधीही कोणतीही व्रते केली नाहीत. पूर्ण श्रद्धेने पण त्यातील सार जाणून, शास्त्रीय भाग जाणून केली. आम्हीही तसेच करावे हा आग्रह. अजूनही तिला काही गोष्टीत शंका असेल, तर प्रथम शंका निरसन करून घेते कोणा  पंडितांकडून, जाणकारांकडून, आणि मग पूर्ण मन लावून ती धार्मिक गोष्ट करते.

मी आस्तिक आहे. सश्रद्ध आहे. धार्मिक गोष्टी मला आवडतात. पण, त्याचे थोतांड केलेले आवडत नाही. म्हणून आपण बरे, आपली श्रद्धा बरी असेच आजवर आहे. श्रद्धा ही खुपच पर्सनल बाब आहे. म्हणून मी मला जे योग्य वाटले माझ्या धर्मातले, ते निःसंकोच घेतले. काही पारखून घेतले. आणि मनापासून करते जे जे आवडलं ते, चुकत माकत…काही कर्तव्य म्हणून तर काही खूप मजा येते म्हणून! पुण्य किती मिळते व ते कसं मोजायचं हे मात्र अजून समजलं नाहीय्ये!!

जेंव्हा मी आई झाले, तेंव्हा मला माझ्या आईची हे सारं आम्हाला समजावून सांगायची तळमळ कळली. आता मीदेखील माझ्या छोटीला अकबर बिरबल, इसापनीती, राजा- राणी, याबरोबरच देवांच्या गोष्टी पण सांगते. कारण मला वाटत, आईनेच यासर्वाची ओळख करून द्यायची असते.

तसा आपल्या धर्माचा पसारा मोठा आहे. वर्षभर अखंड सर्व महिन्यांमध्ये काहीना काही सण, उपवास, इ. असतच. पण, माझा आपला श्रावण सगळ्यात आवडीचा! मुलींसाठी तर प्रचंड आनंद, उत्साह, करमणूक यांनी भरलेला असतो श्रावण महिना. विशेषतः सासुरवाशीणीन्साठी. छोट्या मुलींसाठी तर पर्वणीच…नवीन फ्रॉक, कपडे, बांगड्या, टिकल्या, मेहेंदी, कौतुक, सगळच येतं वाट्याला. पावसाने हिरवागार झालेला असतो निसर्ग आणि त्याबरोबरच देवाची ओढ लावणारी व्रते, त्या निमित्ताने होणाऱ्या भेटी – गाठी, दान- धर्म, उपवास, नेम- नियम, या सगळ्यात एक खूप आनंद आणि प्रसन्नपण भरलेले असते.

मी जशी लहानपणी आई आणि ताई बरोबर बसून श्रावण सुरु झाल्यापासून कहाण्या वाचायचे रोज वेगवेगळ्या, तशा माझ्या छोट्या लेकीला देखील सांगायला सुरुवात केली. पण ती पडली इंग्रजी माध्यमात शिकणारी…जुन्या पठडीचं मराठी तिला कळायचं नाही. म्हणून तिला त्याच कहाण्या सोप्प्या करून, वर्तमानाच्या संदर्भाने,  गोष्ट रूपात सांगितल्या. तिला त्या फारच आवडल्या. मग वाटलं, त्या सोप्या केलेल्या लिहून काढल्या तर?! मग तो प्रयत्न केला…आणि म्हटलं, चला त्या सगळ्यांबरोबर शेअर करू….पुण्य तसं पण वाटलेलं चांगलं असतं नाही का?! तर तुम्हाला आवडलं तर जरूर वाचा…तुमचा अभिप्रायही कळवा. हा श्रावण आपल्या सर्वांवर सुख- समाधानाची, प्रसन्नतेची  बरसात करूदे.

दिव्यांची अमावस्या

आज आषाढ अमावस्या. यालाच दिव्याची अमावस्या असंही म्हणतात. आज घरातले सर्व दिवे/ दीपक स्वच्छ करून, त्यांची साग्रसंगीत पूजा केली जाते. नैवेद्य दाखवला जातो. त्याच बरोबर प्रार्थना केली जाते, की आयुष्यातील अंधार रुपक परिस्थिती नष्ट होवो. दिव्यांचे तेज आपल्या घरात, आयुष्यात सतत राहो. त्याच दिव्याच्या अमावस्येची एक कहाणी आहे, जी आज वाचली जाते, ती छोट्या गोष्टी –रूपात मी माझ्या लेकीला सांगते नेहेमी.
एक छानसं गाव होतं. त्या गावात राजा देखील होता. त्याच्या परिवारात एक सूनही होती. तिने एकदा घरातला पदार्थ स्वतः खाल्ला, पण कोणी रागावू नये म्हणून तिने उंदरांवर खोटा आळ घेतला. उंदरांना राग आला. त्यांनी या आळाबद्दल तिचा सूड घ्यायचं ठरवलं. त्यांनी तिची चोळी रात्री गुपचूप पाहुण्यांच्या अंथरुणात नेवून टाकले. दुसरे दिवशी हिची पंचायीत झाली, फजिती झाली, आणि घरातील सर्वांनी तिला घरातून हाकलून दिले.
ही स्त्री, राजाची सून, खूप चांगली होती. रोज घरातील कामाबरोबरच, सर्व दिवे घासून पुसून त्यांची मनोभावे छान पूजा करायची. आषाढ अमावास्येच्या दिवशी त्यांना नैवेद्यही दाखवायची. पण या वर्षी ती घरी नसल्याने दिव्यांची पूजाही होत नव्हती आणि अमावस्येला देखील नाहीच झाली. त्या अमावास्येच्या दिवशी राजा शिकारी हून परत येत असताना रात्र झाल्याने जंगलातील झाडाखाली थांबला..तिथे त्याच्या कानावर काही आवाज आले. त्याने पाहिले की गावातील सर्वांच्या घरातील दिवे झाडावर जमले होते आणि कोणाकोणाच्या घरी कशी कशी पूजा झाली, काय काय नैवेद्य होता याची चर्चा करत होते. तिथे राजाच्या घरातील दिवे उदास पणे म्हणाले, “त्याची सून किती चांगली होती, आमची रोज पूजा करायची, अमावास्येला नैवेद्य दाखवायची. यंदा ती नाही, तर आमचा थाट तर सोडाच, पण आमची पूजाच झाली नाही.” इतर दिव्यांनी त्यांना याचं कारण विचारला असता त्यांनी तिची खरी कहाणी सांगितल आणि म्हणाले,”ती जिथे असेल तिथे सुखात असो”. ते ऐकून राजाला आपली चूक उमजली. त्याने घरी येवून, आपल्या घरच्यांना सर्व सांगितले व आपल्या सुनेला मानाने घरी परत आणले. तिची क्षमा मागितली.

माझ्या छोटीला दिवे बोलतात हे काही फारसं पटलं नाही. पण, आपल्या चुकीचा आळ दुसऱ्यावर टाकू नये, हे मात्र तिला समजलं. तिच्या भाषेत अमावस्येला दिव्यांचे पूजन हे ‘काइंड ऑफ थैंक्स गीविंग’ आहे!!

जसे दिव्यांच्या आशीर्वादाने गोष्टीतल्या राजाच्या सुनेच्या आयुष्यातील संकट टळले, सुख परत आले, तसे ते आपल्यालाही मिळो ही सदिच्छा!

दिव्यांची अमावास्या

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू ….

आज गुरुपौर्णिमा! महान ऋषी आणि गुरु व्यास मुनी यांच्या आदराप्रीत्यार्थ आजचा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून आपण साजरा करतो. आता मोठे झाल्यावर आपण कोणी अध्यात्मिक गुरु करून त्यांच्या मठात/ आश्रमात जावून पाया पडतो, पण, शाळेत आजच्या दिवशी सगळ्या शिक्षकांच्या पाया पडायचो त्याची गम्मत काही औरच होती. लहान असताना शाळेत आपल्या आवडत्या बाईना घराच्या बागेतील गुलाबाचे फूल किंवा घरच्या जाई -जुईचा गजरा नेऊन देणे यात जो आदर आणि प्रेम वाटायचं ते शब्दात सांगणे कठीण आहे. ज्यांचे आई वडील शिक्षक त्यांना तर हा दिवस खासाच लक्षात राहिला असेल. मी ते अनुभवलय. गुरुपौर्णिमा, टीचर्स डे, या दिवशी आमच्या घरी भरपूर फुले, किंवा पेढे असायचे…खूप मुले – मुली यायची आई बाबांना नमस्कार करायला..आई मग आदल्या दिवशी मुद्दाम खोबऱ्याच्या वड्या वगैरे करून ठेवायची, कारण तिच्या मते नमस्कार रिकाम्या हाती घेऊ नये…त्यांच्यावर इतकं प्रेम करणारे विध्यार्थी ही ग्रेट आणि त्यांच्या घरी जन्माला येणं हे माझं भाग्य. आपल्या आई- वडिलांच्या बद्दल इतरांचा इतका आदर पाहून मन आभाळाइतका भरून यायचं आणि ते पाहूनच माझ्या शाळेतील गुरूंचा जास्त आदर करू लागले मी.

हाताला धरून शाळेत मला माझ्या बाबांनीच पोहोचवलं कारण आईचे कॉलेज सकाळचे. बाबा त्यांच्या वेळा सांभाळून मला शाळेत अथवा क्लासला सोडणे, इ. कामे करत. म्हणजे तेच खरे माझे गुरु. अभ्यास घेणे, काहीही मागू ते पूर्ण करणे, हे आई इतकेच बाबा देखील करायचे. शाळेच्या सर्व गोष्टींची माहिती ठेवायचे…बिचारे “बाबा, तुमचं ड्रोइंग माझ्यापेक्षा खुपच छान आहे” असं म्हटलं की कितीही दमलेले असले तरी माझ्या जीवशास्त्राच्या व्यवसायातील उंदीर, बेडूक इ. काढून द्यायचे. ते स्वतः गणिताचे प्राध्यापक. म्हणून गणित जमलं. नाहीतर बोंबच होती माझी. त्याचं अभ्यास करून घेणं हि आई पेक्षा वेगळच. त्यांचा अभ्यास पहाटे. पहाटे लवकर उठवून स्वतः चहा करून द्यायचे. आणि मग मी पेंगत पेंगत गणिते, प्रमेये, असले नं झेपणारे प्रकार व्यायाम केल्यागत करायचे. आता आठवण पण नको वाटते अभ्यासाची, पण त्यांच्या हातचा चहा मात्र आठवावासा वाटतो कारण त्यात जे प्रेम होतं, त्याची तुलनाच नाही. आई आपली, सगळ्या भाषा आणि इतिहास याचा अभ्यास बिनबोभाट कधीपण घ्यायची. बहुतेक वेळा आमचा मायलेकींचा अभ्यास स्वयंपाकघरात व्हायचा. ती पोळ्या- भाकरी करता करता, हिंदी, संकृत, इंग्रजीचे व्याकरण, मराठीचे निबंध…सगळं आरामात. पण, परवाच ह्या शब्दाचा समास सोडवला होता, इतक्यात कसं विसरलीस? हे ही ऐकवायची. तिच्या मते पाठांतराला पर्याय नाही..मला त्याचा जाम आळस..तिच्या वडिलांच्या कडक शिस्तीमुळे तिचं पाठांतर इतकं चांगलं झालं, हे कळल्यापासून मी आजोबांकडून संस्कृत वगैरे शिकण्याच्या फंदात पडले नाही. कारण, त्यांच्यासमोर “नाही” या शब्दाला जागाच नव्हती. पण, त्यावेळी सर्व भाषांमध्ये पहिल्या ३ मध्ये येण्याचा मान आई  मुळे मिळाला. तेंव्हा गुरु म्हणून आई- बाबांना धन्यवाद म्हणण्याची पद्धत नव्हती, अक्कल पण नव्हती. चांगले मार्क्स मिळालेले पेपर घेऊन येऊन दोघांच्या गळ्यात पडायचे…आजही तेच करते. कोणी चांगलं म्हंटलं, कौतुक केलं, की आई- बाबांना मिठी मारायची….त्यांच्याच मुळे मी ‘मी’ आहे!!

प्राथमिक शाळेत मला नेहेमी सगळ्याच बाई, आताच्या भाषेत टीचर, आवडायच्या. कारण, नुसत गोड बोलून कौतुक करनाऱ्या बाईंच्या बरोबरीने लांब पट्टीने फटके देणं हेही गरजेचं होतं…अगदी प्रामाणिकपणे सांगते. मी खूप फटके खाल्ले आहेत. निम्मे वेळा गृहपाठ करायला विसरले म्हणूनच मार खाल्ला आहे. जरा वरच्या वर्गात गेल्यावर, मागच्या बेंच वर बसून गप्पा मारल्या म्हणून पण फटके खाल्ले…तर कधी, वर्गाबाहेर उभी राहिले…मी कधीही या शिक्षा घरी लपवल्या नाहीत. बिनधास्त सांगितलं आई ला. तिची प्रतिक्रिया ठरलेली असायची,”मी तू जातेस त्या शाळेत सुरुवातीला शिकवलं आहे. तिथले सगळे शिक्षक माझे जुने सहकारी आहेत. ते रागावले, म्हणजे तुझीच चूक असणार. पुढच्या वेळी पुन्हा असं करू नकोस म्हणजे झालं.” शाळेत शिक्षा झाली म्हणून घरी मार कधीच पडला नाही…कदाचित त्यामुळेच कधी लपवा- लपवीची गरज पडली नाही आणि सवय ही लागली नाही. मला आज माझे विद्यार्थी जेंव्हा आई- वडिलांपासून काही लपवताना दिसतात तेंव्हा मी त्यांना रागावते. कारण, जी गोष्ट आपण सांगायला हवी, ती जर इतरांकडून आईला कळली तर तिला जास्त दुःख होतं.

तेंव्हा एक क्रेझ असायची. कोणत्याही शिक्षकाचा फेवरीट विद्यार्थी होण्याची. म्हणजे, त्या शिक्षकांच्या तासाला त्यांनी आपल्यालाच  फळा पुसायला सांगणे, खडू आणायला सांगणे, कविता किंवा धडा वाचायला सांगणे, अस काही काही. मलाही ती क्रेझ होती. आता माझी मुलगी प्राथमिक शाळेत आहे. लाडीक तक्रार करते कधी कधी, ” मम्मा, त्या टीचर ची मी इतकी लाडकी आहे की सगळी म्हणजे सगळी कामं मलाच सांगतात त्या…सारखं वर- खाली जावून माझे पाय दुखतात.” मी एक धपाटा घालते मग तिला, म्हणते,” अग, नशीब लागतं तेंव्हा असं लाडके पण वाट्याला येतं. काही हरकत नाही पाय दुखले तर मी चेपेन तुझे पाय.”

पुढे कॉलेजला गेल्यावर तर मज्जाच होती. आई बाबा त्याच कॉलेज मध्ये प्राध्यापक. म्हणून लाड खुपच झाले. पण, तितकंच बारीक लक्ष पण ठेवायचे सगळे…त्यामुळे फारसं कॉलेज लाईफ एन्जॉय वगैरे नाही करता आलं. कारण, एखादे लेक्चर बुडवले, की लगेच चौकशी..”आज तुमची मुलगी दिसली नाही वर्गात”…पण, कधी राग नाही आला त्यांचा…त्यात माया जास्त होती ! आज त्या सगळ्यांची फार आठवण येते. कारण, जेंव्हा पुढील शिक्षणासाठी पुण्याला आले, तेंव्हा ९९ % शिक्षक हे “मी बरा, माझे काम बरे” असेच वाटायचे. उरलेल्या १% शिक्षकांनी मात्र माझे ‘लाईफ टाईम गुरु’ ची जागा घेतली.

शिक्षकी पेशा पिढीजात असल्यासारखी, मी वकिलीचे शिक्षण घेवून सुद्धा कॉलेज मधेच लागले नोकरीला. तेच वातावरण इतकं रक्तात भिनलं आहे..की दुसरीकडे करमतच नाही जणू. माझ्या आई बाबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पहिल्या दिवसापासून हा व्यवसाय प्रचंड मनापासून सचोटीने केला. त्यांच्या इतकं नसेल, पण भरभरून प्रेम दिलं माझ्या विद्यार्थ्यांनीही, हे माझं भाग्य. आता सोशल मिडिया मुळे दूरदूरचे जुने जुने विद्यार्थी देखील संपर्कात आहेत, राहतात..त्यांची प्रगती पाहून मस्त फिलिंग येतं. काय ते नक्की सांगता येत नाही….पण आपल्याच घरातील कोणाची भरभराट होतेय हा आनंद होतो. काहीजण आवर्जून आज, किंवा टीचर्स डे ला मेसेज करतात, फोनही करतात. छान वाटत. मी ही माझ्या काही शिक्षकांना, मित्र -मैत्रिणींना, ज्यांनी वेळोवेळी काही शिकवलं , योग्य मार्गदर्शन केलं त्यांना आज आवर्जून आठवण काढून फोन करते, मेसेज करते. कारण, आयुष्यात सगळ्यात मोठे गिफ्ट कोणी आठवणीने तुमची आठवण ठेवणे हेच असते!

 

 

 

 

आषाढी एकादशी…आणि मी!

13556846_146713122416731_1714851102_n

एक महिन्याहून अधिक काल लोटला. पंढरीच्या दिशेने चाललेले वारकरी वाटेवरच्या गावांमध्ये भक्तिरसाची पेरणी करत आज अखेर पंढरपुरी पोहोचले. सोशल मिडिया मुळे आपण ही त्या वारी मध्ये सामील झाल्याचे फिलिंग आले..आणि ज्या दिवसाची आपण सगळे आतुरतेने वाट पाहतोय तो दिवस म्हणजेच ‘आषाढी एकादशी ‘ येवून ठेपला!

मराठी कुटुंबांमधे या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे. श्रावणाची चाहूल, पावसासाठी विठूरायाची आळवणी, सामान्य जनतेला आपलासा वाटणांरा सावळा विठुराया,  रांगेमध्ये उभे राहून घेतलेले विठुरायाचे दर्शन..त्याच्या गोष्टी, आणि नेहेमी घरात न होणारा उपवासाचा फराळ..अनेक कारणांसाठी मला लहानपणापासूनच या दिवसाचे आकर्षण आहे. माझे दोन्हीही आजोबा हे विष्णूभक्त! श्री विठुराया त्यांचेच अवतार. लहानपणी, साताऱ्याला गेलेलो असताना, संध्याकाळी आजोबा नेमाने विठोबाच्या देवळात जायचे. जास्त वेळ तिथे बसले, तर आजी आम्हाला धाडून द्यायची बोलवायला. इथून त्याची ओळख झाली. मग हळू हळू देवांच्या गोष्टी, संतांच्या गोष्टी यातून त्याचे मायाळू पण, भक्तांवरचं प्रेम, त्या प्रेमातून भक्तांना जगण्यासाठी मिळणारी उर्जा याचं गारुडच पडलं मनावर. अगदी गणपती मध्ये उंच सूर लावून “गरुडा वरी बैसोनी माझा कैवारी आला…हो माझा कैवारी आला” हे आळवताना सुद्धा विठुराया स्पेशलच वाटायचा कोणी! मग कधीतरी योग आलाच पंढरीला जायचा. जे गोष्टीमध्ये वाचलं होतं ते पंढरपूर याची देही याची डोळा पाहिलं. त्यानंतर अनेकदा योग आला पंढरपूरला जायचा…पण पहिली भेट अजूनही लक्षात आहे जशीच्या तशी.

माझ्या आई ची आई, खुपच धार्मिक. वर्षभर अखंड व्रत वैकल्य सुरु असायची. आणि त्याच्या धार्मिक गोष्टी पण तिच्या कडून ऐकायला मिळायच्या. मला वाटतं, धर्माचे संस्कार लहानपणीच होतात. व्हावेतच. आपला धर्म समजून घेण्यात आणि तो पुढे नेण्यात मला खरंच अभिमान वाटतो. इतर धर्मांचे सण जितक्या सहजतेने आपण साजरे करतो, तितक्याच किंबहुना त्यापेक्षा कैक जास्त पटीने आत्मीयतेने आपले सणवार देखील साजरे करावेत, किमान माहीत करून घ्यायला काहीच हरकत नाही !

लहानपणी आमच्या कडे काम करणारी सरुबाई, वारीला  जावून आली की साखर फुटाणे आणि चुरमुऱ्याचा प्रसाद आणायची. तो खाताना, तिच्या पाया पडताना आपणच पंढरपूरला जावून आल्याचा,  आणि  पुण्य मिळाल्याचा आनंद व्हायचा. ते चुरमुरे हवेने सांदळलेले असायचे पण त्याची चव अक्षरशः अमृतासारखी.

माझं लहानपण कोकणात गेलं. घरच्या बागेत केळीची, नारळाची झाडं, बागेत पपई, रताळी, पेरू असे हौसेने काहीबाही होतेच. उपवास म्हणून कोकणात अनेक लोक केळीच्या पानावर जेवतात. आमच्या कडे उपवासाच्या दिवशी अनेक लोक केळीची पाने न्यायला यायचे. त्याच बरोबर घरच्या केळीच्या घडातली केळी देखील आवर्जून द्यायचो आम्ही, कच्ची हवी तर कच्ची, पिकलेली हवी तर पिकलेली !  मग मलाही वाटू लागलं, आपण का नाही फराळ करत केळीच्या पानावर? मग मी देखील भर पावसात, बागेत जावून केळीची टोकाची पाने आणून फराळाचा आग्रह करायचे. एके वर्षी चिपळूणला पूर आला होता आषाढीच्या दिवशी. तरीही मी पाण्यात उतरून केळीचे पान आणलेले आठवते आहे!! मSग.. तो एक सोहळाच असायचा. त्या केळीच्या पानावर गरमागरम भगर, आणि दाण्याची मस्त आमटी, त्यावर साजूक तूप, उपवासच थालीपीठ, उकडलेल्या बटाट्याची उपवासाची भाजी…सोबत, काकडीची कोशिंबीर, बागेतल्या नारळाची हिरवीगार चटणी,  उपवासाचं घरगुती लिंबांचं लोणचं,  घरी केलेल्या साबुदाण्याच्या पापड्या, बटाट्याचे पापड…आहाहा! आजपण त्या केळीच्या पानाची चव कित्ती प्रयत्न केला तरी स्टीलच्या ताटलीत घेवून खाल्लेल्या फराळाला येत नाही. कोणी फराळाचा बेत पाहून काही बोलेल तर माझं उत्तर असे, “एकादशी दुप्पट खाशी असं म्हणतातच!!” हा एकच उपवास मी इतका साग्रसंगीत फराळ करून करते. बाकी उपवासांच्या दिवशी  स्वैपाक घराला सुट्टी हाच भाव असतो!

आजच आईचा फोन आला, “तुझी आठवण काढून सगळा बेत एकदम साग्रसंगीत करणारे बरं का!” एकदम कोकणातल्या घराची आठवण आली. आता केळीची पाने पैसे मोजून आणण्याचा उत्साह नाहीच उरला.

तुकोबाला वैकुंठाला न्यायला येणारे गरुड वाहन एका आषाढीला माझ्या पुण्यवान आजोबांनाही घेवून गेले. तेंव्हा पासून आषाढीला आधी त्यांची आठवण…आणि मगच विठ्रुरायाची!

Do I Know Myself ??!!

Oh..stupid it may sound…but, a key question one needs to ask himself at different stages of life..earlier the better!!

Can we really know ourselves? our identity is created first by our family..HE or SHE is like this…HE or SHE likes that..and we are living in this world with a given name…or with a name liked by others and growing with the thoughts of what others will think about us or how others perceive us. Does it really give us time to really really know what we are? Who we are?

How many of us stumble at the question in our job application form or while writing our resume about our positives / strengths and negatives/ weaknesses?

How many of us lie when they pen down their hobbies??

I am sure, I will have some company of people saying YES for above questions!!

While studying organizational behavior (I studied it more during my teaching career) I got to finally understand clearly the concept of ‘Knowing yourself and Knowing Others’. I realized, the problem in most of the issues that keep bugging us everyday lies either in the two! Either the conflict arises because we don’t know our own nature completely….or we are misunderstanding other person or not knowing him completely..this behavioral theory is quite lengthy one to explain…

but, in simple words, first I tried to write down about myself, my likes, dislikes, my strengths and weaknesses (what I thought), my reactions to specific actions/ incidences, and tried to analyze…but, is it enough? It is not necessary that others are knowing me the way I do! Means, they may have different answers if asked about myself, they may perceive me differently..here is the point!! If there is a huge gap between answers penned down by you about yourself, and answers from your siblings, close friends, colleagues, etc., understand that either you don’t know yourself or they have misunderstood you; and problems in relationships are bound to come…

However, we need not worry much, if we are able to know ourselves properly, still half the problems are solved!

(..to be continued)

आतला आवाज

कधी डोकावून पहावसं वाटतं मनात. खूप खोल. शांत बसावं…विसरून सगळा कोलाहल आजूबाजूचा. ऐकावा फक्त आवाज आपला…आतला !!

सहज नाही जमलं..पण जमतच जातं…खिडक्या बंद करून घेणं मनाच्या…पुसट होत जातो मग आवाज आजूबाजूचा…ऐकू येतो फ़क़्त आवाज आपला…आतला !!

सहज नाही जमलं…पण जमतच जातं …कोलाहलात असून मग्न होणं…गर्दीत असून एकट राहण…
आवडू लागतो मग …आवाज आपला…आतला !!

-मृणाल

कधी कधी स्वतःचा झगडा
स्वतःशीच असतो
सगळेच कोपरे मनाचे
नसतात उजळायचे
कधी कधी मौनातही
सापडते शांतता
विड्राॅवल हाच मार्ग
सोपा वाटत आलाय मला
प्रत्येक आनंद माझा असावा
हा अट्टाहास कधीच नव्हता
कधी कधी वाट पाहणंही
सोपं वाटलं मला
तर कधी आनंदातून
बाहेर पडायची घाई
समजतेय मीच मला अजून
शांत होतेय वावटळ आतली.

-मृणाल

प्रत्येक जन्मात स्त्रीच व्हायला आवडेल मला!

रोजच अनुभवते पण तरी नवीन….किती रुपांमध्ये जगण्याचं अनोखं गिफ्ट..प्रत्येक जन्मात स्त्रीच व्हायला आवडेल मला!

कधी मी दुर्गा कधी भवानी
कधी पार्वती कधी मोहिनी
कधी चंचला कधी भामिनी
कधी जिजाऊ कधी हिरकणी
कधी जनाई कधी माऊली
कधी पांघरुण कधी सावली
कधी मी राधा कधी मी मीरा
कधी नाव मी कधी किनारा
किती रुपांतून माझे स्त्रीपण
कधी प्रतिबिंब तर कधी मी दर्पण!!

-मृणाल

The Power of POSITIVITY…

When we tolerate negativity in our life, we get more of it! so break the cycle before it breaks us…said Di Riseborough!

I will step further and say get out of negativity first and then only you will be able to experience the power of positivity in life.

Stop thinking -ve..stop watching -ve and close your MIND if someone around you talking -ve…even quit the room if it has -ve discussions!!

You never know, when that powerful moment in the Universe catches your one thought and brings it in reality. So, its always better to think positive and let that happen with the power of positivity and power of universe!

Wish you all a Happy day and week filled with POSITIVITY!!

Being Strong…

Being strong is a quality…not necessarily inherent, but, can be inculcated in our personality by our own efforts and sometimes it comes automatically due to life situations.

Its all nothing but, a game of mind! Its all about our will power to overcome adversities in life. Stronger our urge to live, to be happy, to be someone, to achieve something…stronger will be the efforts and results, too!

I agree that life is a roller coaster ride…it really increases the adrenaline levels at times! but, being calm and balanced and not losing patience through out, is the skill. We certainly can achieve it with efforts, if its not a born gift!

Share, discuss, read, empathize, observe people…how others do it and that too, helps. No matter I agree that everyone wears his own shoes!

Life is very precious…time runs…crying, cribbing and worrying doesn’t solve problems, but, being strong and facing it does!!

Love your self, love life…be strong & don’t forget to be kind and being positive! coz, what you give, what you think about yourself and others.. comes back to you!!